ठाणे :- कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढू लागल्याने सोशल डिस्टंसींगचे निर्बंधांची कठोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दितल्या शेअर रिक्षा प्रवासावार बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही अशा पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी आणि शनिवारी एकूण ७६७ रिक्षाचालकांवर कारवाई करून ३,८७,५०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दितल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काटोकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले आहे. तसेच, १४४ कलमान्वये जमावबंदी आदेश लागू असून त्याचीही अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना पोलिस दलाला देण्यात आल्या आहेत. सरकार, पोलिस आणि पालिकेने वारंवार बजावल्यानंतरही नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. रिक्षात दोनच प्रवाशांना बसविण्याची मुभा असली तरी शेअर तत्वावर चालणाऱ्या रिक्षा आजही चार ते पाच प्रवाशांनाची ने आण करताना दिसतात. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या रिक्षाचालकांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी वाहतूक शाखेच्या सर्व विभागांना दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
शुक्रवारी एकूण ३४१ रिक्षाचालक नियंमांचे उल्लंघन करून प्रवाशांची ने आण करताना आढळले आहेत. तर, शनिवारी ४२६ रिक्षाचालक या मोहिमेत दोषी आढळले आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. ११ रिक्षाचालकांनी जागेवर दंडाची रक्कम भरली असून उर्वरित रिक्षाचालकांकडून १ लाख ६८ हजार ५०० रुपयांची दंड वसूली शिल्लक असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
फ्रंट सीटवरही कारवाई
शेअर रिक्षांमध्ये प्रवाशांची ने आण करताना अनेक रिक्षाचालक प्रवाशांना आपल्या शेजारी बसवतात. शुक्रवारी फ्रंट सीटवर प्रवासी बसविणाऱ्यांच्या १०१ रिक्षाचालकांच्या विरोधातही कारवाई करण्यात आली आहे.