ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद.
ठाणे -: ठाणे जिल्हाच्या ग्रामीण भागात कोराना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या ग्रामस्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत, या कर्मचाऱ्यांना तात्काळ एक हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता वितरित करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दिले. त्यांनी आज कोविड19 करिता कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची दृक्श्राव्य माध्यमातून आढावा बैठक घेतली.
या आढावा बैठकीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि. नेमाने यांच्यासह सर्व जिल्हास्तरीय संपर्क अधिकारी तसेच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी सहभाग घेतला.
जिल्ह्यातील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी आदी कर्मचारी कोविड19 च्या कामासाठी ग्रामपंचायतस्तरावर कार्यरत आहेत. त्यांना प्रोत्साहन म्हणून १ हजार रुपये भत्ता देण्यात येणार आहे. सोनवणे यांनी या बैठकीत तालुकानिहाय आढावा घेत ग्रामीण भागातील कोरोना संदर्भातील परिस्थिती जाणून घेतली. यामध्ये सध्यस्थितीत ग्रामीण भागात कोरोना बाधितांची परिस्थिती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, नागरिकांना अन्न धान्य वाटप करणे, कम्युनिटी किचनमधून गरजूना जेवण पुरवणे, आरोग्य विभागाअंतर्गत सर्वेक्षण, विलगीकरण कक्ष, पाणी टँचाइ कामे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
*अधिकाऱ्यांनी कार्यालयात हजर रहा*
या काळात सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी दरदिवशी कार्यालयात हजर राहून कामकाज करावयाचे आहे. शिवाय आवश्यक असल्यास प्रत्येक्ष फिल्डवर जाण्याच्या सूचनाही श्री. सोनवणे यांनी दिल्या.
*कम्युनिटी किचनचा आधार*
या काळात मजूर, स्थलांतरित बांधव, रोजनदारी काम करणारे कामगार, वीटभट्टी कामगार, निराधार आदी लोकांसाठी ग्रामपंचायत स्तरावर कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवण वाटप केले जात आहे. जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर या तालुक्यात कम्युनिटी किचनमुळे दररोज हजारो लोकांनां जेवण पुरवले जात आहे.अनेक दानशूर व्यक्ती, संस्था तसेच तहसीलदार यांच्या मार्फत हे कार्य सुरू आहे. तसेच गरजू लोकांना स्थानिक स्तरावर अन्नधान्य देखील वाटप करण्यात येत आहे.
*विलगीकरण कक्षाच्या जागा निश्चित करण्याचे काम सुरू*
पंचायत समिती स्तरावर खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकर कक्ष तयार करण्यात येत आहे. त्यासाठी तहसीलदारांच्या सहकार्याने विलगीकरणासाठी ग्रामपंचायत स्तरावर जागा निश्चित केल्या जात आहेत.
*शहरा लगतच्या ग्रामपंचायतीने सतर्क राहा*
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.ग्रामीण भागात योग्य ती खबरदारी घेतली जात असली तरी शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतीने सतर्क राहण्याच्या सूचना श्री.सोनवणे यांनी दिल्या. या भागातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दररोज निर्जंतुकीकरणं फवारणी करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.
*पाणी टंचाईची कामे सुरू करा*
कोरोनामुळे पाणी टंचाईच्या कामांना खीळ बसू नये यासाठी काहीच दिवसांपूर्वी ग्रामसभेची अट शिथिल करण्यात आली आहे.त्यामुळे टंचाईच्या कामांकडे दुर्लक्ष न करता टंचाईच्या कामाकडे लक्ष देण्याची सूचना सोनवणे यांनी दिल्या. वेळोवेळी येणाऱ्यां शांसनाच्या आदेशाचे पालन करून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून कार्यरत राहा असे सोनवणे यांनी सांगितले.