राज्यभरात सर्व कामकाज बंद असल्याने आपल्या गावातील नागरिक पुणे, मुंबई ,ठाणे ,कल्याण व इतर शहरांतून गावी परत येत आहेत. त्यांची नोंद ते गावात आल्यावर स्वतंत्र ठेवणेत यावी. तसेच गावात नव्याने आलेल्या नागरिकांना घरीच बसण्यास सांगावे. त्यांचेवर नियंत्रण ठेवण्यात यावे. यासाठी गावातील ग्रामपंचायत कर्मचारी, कोतवाल, पोलीस पाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची मदत घ्यावी व पदाधिकारी यांनीही याबाबत जबाबदारी स्वीकारावी. आपल्या गावात कोणत्याही प्रकारे बाधित व्यक्ती येणार नाही यावर लक्ष ठेवावे. येणाऱ्यांपैकी कोणी चुकून बाधित व्यक्तींच्या सहवासात आले असण्याची शक्यता असू शकते. म्हणून ते 14 दिवस स्वतः हुन आपल्या घरातील व गावातील लोकांपासून वेगळे राहतील यावर काटेकोरपणे लक्ष ठेवावे. तसेच गावात कुठेही ५ पेक्षा जास्त व्यक्ती जमा होणार नाही यावर नियंत्रण ठेवावे. कोणालाही सर्दी , ताप व खोकला यांची लक्षणे असल्यास आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांचेशी तात्काळ संपर्क करा.
गावात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळून इतर कोणतेही व्यवसाय/दुकाने सुरू ठेऊ नका. या सर्व प्रक्रियेत लोकांना विश्वासात घ्या. तथापि कुठेही शासनाने घालून दिलेले नियम व बंधन पाळले जात नसल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस स्टेशन मध्ये संबंधितांवर गुन्हे नोंदवा. वेळ नाजूक आहे म्हणून थोडी कठोर भूमिका घ्यायची आवश्यकता भासल्यास ती देखील घ्यावी लागेल. महाराष्ट्र आता 3 ऱ्या आठवड्यात प्रवेश करत आहे. पुढील १५ दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. जर गावावर आपण योग्य नियंत्रण ठेवले तर घाबरून जाण्यासारखी परिस्थिती निश्चित येणार नाही. घाबरून न जाता, डोकं शांत ठेऊन गावात येणाऱ्या नागरिकांना सर्व सूचना द्या. आणि आपल्या सर्वांच्या हितासाठी याची काटेकोर अंमलबजावणी करा. प्रशासकीय यंत्रणा काम करतच आहे पण ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या ग्रामस्तरावर सहकार्याचीच नाही तर सहभागाचीसुद्धा अत्यंत आवश्यकता आहे - दीपाली पाटील
अध्यक्ष ठाणे जिल्हा परिषद