ठाणे - : राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ठाण्यात आज एल्गार केला. शेतकऱ्यांची फसवणूक, महिलांवरील वाढते अत्याचार आदींबरोबरच शिवसेनेने ठाण्यातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करता केलेल्या फसवणुकीविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. ठाण्यातील जनतेच्या मागण्यांसाठी आगामी काळात आणखी उग्र आंदोलने करण्याचा निर्धार आमदार व भाजपाचे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज झालेल्या निदर्शनात माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार संजय केळकर, आमदार व शहराध्यक्ष निरंजन डावखरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. माधवी नाईक, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, नगरसेवक अॅड. संदीप लेले, मिलिंद पाटणकर, नारायण पवार, भरत चव्हाण, मनोहर डुंबरे, मुकेश मोकाशी, कृष्णा पाटील, सुनेश जोशी, नगरसेविका आशा सिंह, प्रतिभा मढवी, दिपा गावंड, अर्चना मणेरा, मृणाल पेंडसे, कविता पाटील, नंदा पाटील, नम्रता कोळी, महिला आघाडीच्या हर्षला बुबेरा, मनोहर सुगदरे, भाजयुमोचे निलेश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते कैलास म्हात्रे, जयेंद्र कोळी, राजेश मढवी, दिपक जाधव, सागर भदे, स्वानंद गांगल आदी सहभागी झाले होते.
राज्यातील शेतकऱ्यांची राज्य सरकारने फसवणूक केली. अवकाळी पाऊस व कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. तर गेल्या महिनाभरात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्यानंतर सरकार ढिम्म आहे. त्याचा निदर्शनावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. ठाणे शहरातील जनतेची शिवसेनेकडून फसवणूक करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लस्टर योजनेतून गावठाण व कोळीवाडे वगळण्यात यावे, असा निर्णय घेतला होता. मात्र, गावठाण असलेल्या हाजुरीचा `क्लस्टर’मध्ये समावेश करण्यात आला. महापालिकेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेने वचननाम्यात ५०० चौरस फुटांपर्यंत मालमत्ता करमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. कळवा-ऐरोली रेल्वेमार्गाच्या कामातील विस्थापित २१०० कुटूंबाना कळव्यातच घरे द्यावी, दिवा परिसराला लोकसंख्येच्या प्रमाणात ३२ ऐवजी ४२ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करावा. तसेच चोरीला जाणाऱ्या ७ दशलक्ष लिटर पाणीचोरीची चौकशी करावी, दिवा भागात आरोग्य केंद्र सुरू करावे, दिवा परिसरात बेकायदेशीररित्या डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणाऱ्या ८०० मेट्रिक टन कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने डंपिंग ग्राऊंड तातडीने बंद करावे, अशा मागण्या आमदार व शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.
एसआरएच्या ५०० फूटांच्या घरांची घोषणाच!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मुंबई व महाराष्ट्रात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत ३०० फुटाऐवजी ५०० चौरस फूट चटई क्षेत्र असलेल्या सदनिका देण्याचे जाहीर केले होते. मात्र, या संदर्भात अद्यापि कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही, याकडेही आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले.
ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या, निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना निवेदन दिले.
तीन तेरा वाजविणारे सरकार : सोमय्या
महाविकास आघाडीचे सरकार `तीन तेरा' वाजविणारे आहे. तीन महिन्यांत सरकारने एकही प्रश्न न सोडविता केवळ फसवणूक केली आहे. किमान समान कार्यक्रम हा केवळ सत्तेसाठी तयार केला आहे, अशी टीका माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली.
झोपलेल्या सरकारला जागे
करण्यासाठी आंदोलन : डावखरे
झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी भाजपाने आंदोलन केले आहे. क्लस्टरमधून ठाणेकरांची फसवणूक झाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोळीवाडे व गावठाणे वगळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तो महाआघाडी सरकारने पाळलेला नाही. शिवसेनेने ठाण्यातील ५०० चौरस फूटांच्या घरांना मालमत्ता करात आश्वासन दिले होते. मात्र, ते पूर्ण झालेले नाही. तर दिव्यात रात्री कचरा जाळण्याचा प्रकार होत असून, पाणीचोरीही होत आहे. या प्रकरणी महापालिकेतील सत्ताधारी व पालिका प्रशासनाने निर्णय घ्यावा. अन्यथा, तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार व शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दिला.
राज्य सरकारविरोधात भाजपचा एल्गार, शिवसेनेच्या फसवणुकीकडेही वेधले लक्ष ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने