नुकताच ‘विनोद चोप्रा फिल्म’ने निर्मिती केलेला ‘शिकारा’ चित्रपट प्रदर्शित झाला, हा चित्रपट काश्मिरी हिंदूंच्या जीवनावर आधारित असल्याचे चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी सांगण्यात आले. तसेच प्रत्येक पोस्टरमध्ये ‘शिकारा - द अनटोल्ड स्टोरी ऑफ काश्मिरी पंडीतस्’ असे लिहण्यात आले; मात्र चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दिवशी चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ‘शिकारा - अ टाइमलेस लव्ह स्टोरी इन द वर्स्ट ऑफ टाइम’ असा पालट करण्यात आला. तसेच प्रत्यक्ष चित्रपटात काश्मिरी हिंदु स्त्रियांवर बलात्कार झालेच नाही, हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच काश्मिरी हिंदू या ठिकाणी मारले गेले, एकही मंदिर धर्मांध मुसलमानांनी तोडले नाही, असे धादांत खोटे चित्रण दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात हजारो काश्मिरी हिंदूंच्या क्रूर हत्या, शेकडो काश्मिरी हिंदु माता-भगिनींवर बलात्कार, हजारो मंदिरांची मोडतोड आणि तब्बल 4.5 लाख काश्मिरी हिंदूंचे विस्थापन इतका भयंकर आणि रक्तरंजित इतिहास असतांना तो दडपण्याचा अश्लाघ्य प्रयत्न निर्माता विधु विनोद चोप्रा यांनी केला आहे. काश्मिरी हिंदूंच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी विधु विनोद चोप्रा यांनी 30 वर्षांपूर्वीच्या जखमा उकरून काढून त्यावर मीठ चोळले आहे, त्यामुळे या चित्रपटावर बहिष्कार घालावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले आहे.
काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराची प्रथमच बॉलीवूडने दखल घेतली, असे प्रथमदर्शनी वाटले होते. प्रत्यक्षात मात्र चित्रपटात मुसलमानांचा भाईचारा, भारत द्वेष आणि काश्मिरी हिंदूंच्या पुन्हा काश्मिरात येण्याची आशा न दाखवणे, अशी अत्यंत अयोग्य भूमिका पहायला मिळते. हे काश्मिरी हिंदूंवर पुन्हा एकदा मानसिक अत्याचार केल्यासारखेच आहे, असेही श्री. शिंदे यांनी म्हटले आहे. या चुकीला भारतीय समाज कधीही माफ करणार नाही. त्यामुळे विधु विनोद चोप्रा यांच्या चित्रपटावर बहिष्कार घालावा, असेही आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे, अशी माहिती समितीचे मुंबई प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी दिली आहे.