ठाणे :- वर्तक नगरनजीकच्या भीमनगर भागात एका माथेफिरुने दोन रिक्षा आणि एक घर जाळण्याचा प्रयत्न केला. दोन रिक्षा खाक झाल्या असून एका घराचा दरवाजा जाळण्यात आला आहे.
वर्तक नगर येथील भीमनगर हा दलित वस्तीचा भाग आहे. या ठिकाणी राहणार्या काही स्थानिक गुंडांनी ही जाळपोळ केली असल्याचे स्थानिकांनी सांगितले. सोमवारी रात्री सर्व वस्ती झोपलेली असतानाच पहाटेच्या सुमारास याच भागातील काही समाजकंटकांनी आधी या ठिकाणी दोन रिक्षा जाळल्या. संतोष पटेकर आणि पप्पू यादव यांच्या मालकीच्या या रिक्षा आहेत. त्यानंतर आक्का नाडर यांच्या घराच्या दारावर पेट्रोल टाकून ते जाळले. या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळी रिपाइं एकतावादीचे भय्यासाहेब इंदिसे आणि वंचित बहुजन आघाडीचे राजाभाऊ चव्हाण यांनी भेट दिली. या दोघांनीही वर्तक नगर पोलिसांशी संपर्क साधला असता, गोट्या, सूरज नामक समाजकंटकांनी हे कृत्य केले असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे सांगितले. तर, या आरोपींना दोन दिवसात अटक न केल्यास पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राजाभाऊ चव्हाण यांनी दिला.
दरम्यान, या दोघांकडून या आधीही असेच प्रकार घडले आहेत. महिलांची छेडछाड आणि मद्यपान करुन नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार हे दोघे करीत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
ठाण्यात दोन रिक्षा अन् घर जाळण्याचा प्रयत्न